सोमवार, २० ऑक्टोबर, २०२५

दिवाळी अंक २०२५ - "प्रज्ञेची मुळाक्षरं"

 

दिवाळी अंक २०२५

प्रज्ञेची मुळाक्षरं




                                संपादक 
                            अक्षय घोरपडे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------

  • प्रज्ञेची मुळाक्षरं (दिवाळी अंक २०२५)
         संपादक - अक्षय घोरपडे.
  • Copyrights © Akshay Kishor Ghorpade, 2025

  • मुखपृष्ठ - विजयेंद्र पाटील या मित्राच्या परसबागेत कमळाच्या उगवलेल्या फुलाचे छायाचित्र. 

  • रेखाटणे - © सुनिल अभिमान अवचार.

  • छायाचित्र - © आनागामी

  • या दिवाळी अंकात व्यक्त झालेली मत, विचार आणि सर्जनशील अभिव्यक्ती  ही त्या लेखक कवींची  असून त्याचे सर्वाधिकार हे त्यांचेच आहेत. त्याच्याशी संपादकाचा संबंध नाही.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------




संपादकीय

प्रज्ञेची मुळाक्षरं दिवाळी अंक २०२५ प्रकाशित करतांना मनस्वी आनंद होत आहे. दीपावली हा भारतीयांचा सण आहे. या सणाला अनेक संदर्भ असून सर्व भारतीय हा सण उत्साहात साजरा करीत असतात. घरोघरी दिवे उजळतात. दिव्यांच्या रोषणाईने आसमंत उजळून निघतो. उजळणारा प्रकाश अंधारावर मात करतो. लाक्षणिक अर्थाने बघितले तर मनात साचलेले निराशेचे मळभ दूर सारून आशेच्या प्रकाश किरणात आपले जीवन उजळवले पाहिजे हे सांगणारा हा सण आहे.

      या सणानिमित्ताने साहित्याच्या क्षेत्रातही उत्साहाचे वातावरण असते. दीपावलीचे औचित्य साधून वाचकांना साहित्याची मेजवानी घडावी. जुन्या आणि नव्या साहित्यलेखकांचा तसेच त्यांच्या लेखनाचा परिचय घडावा यासाठी दिवाळी अंक प्रकाशित केले जातात. वाचक ही या दिवाळी अंकांचे जोरदार स्वागत करतात. दिवाळी अंकांवर प्रतिक्रिया देतात. म्हणून माझ्या ब्लॉगच्या निमित्ताने आपणही दिवाळी अंक प्रकाशित करावा हा विचार माझ्या मनात आला. ऑनलाईन पद्धतीने ब्लॉगच्या माध्यमातून दर्जेदार साहित्य वाचकांपर्यंत पोचवावे. आणि त्यांना साहित्याची मेजवानी घडवावी. या हेतूने हा दिवाळी अंक प्रकाशित करीत आहोत. ब्लॉगवर प्रकाशित होणारा हा पहिलाचं दिवाळी अंक असावा.

    या दिवाळी अंकाचे वैशिष्ट्य असे की, या अंकात आम्ही कवयित्री अनुसयाबाई फकिरा इंगळे यांची कविता प्रकाशित करीत आहोत . खान्देश कन्या बहिणाबाई चौधरी  यांच्या समकालीन असणाऱ्या  अनुसयाबाई फकिरा   इंगळे या आहेत. खानदेशातच वास्तव्यास असणाऱ्या अनुसयाबाई यांची  कविता ही खानदेशातच बहरली.  ही कविता प्रकाशित न झाल्याने  ही कविता दुर्लक्षित राहिली. अन्यथा आणखी एका खान्देश कन्येच्या कवितेचा परिचय मराठी कवितेला झाला असता आणि मराठी कविता समृद्ध झाली असती. अनुसयाबाई यांच्या कवितेचं लेणं मराठी वाचकाला परिचित व्हावं आणि उशिरा का होईना या कवितेचा परिचय मराठी वाचकाला  करून देण्याचं काम या दिवाळी अंका निमित्ताने आम्ही करीत आहोत. लवकरच माझ्या ब्लॉगवर या कवितेच्या रूप सौंदर्याचा आढावा घेणारा समीक्षणात्मक लेख मी प्रकाशित करणार आहे.   

       किशोर घोरपडेशशिकांत हिंगोणेकरमधुचंद्र भुसारेवेणुप्रशांतडॉ.मिलिंद विनायक बागुसुनील लोणकरकैलास भालेमहेंद्र गायकवाडउत्तम बावस्करप्रशांत वंजारे, अक्षय घोरपडे, सुरेश साबळे, सुनील अवचार,गणेश रघुनाथ राऊत, दिनेश  मुडे , रवींद्र पांढरे , आत्माराम गोडबोले, सचिन व्ही. काळे, डॉ.अमृत खाडपे आदी लेखकांच्या साहित्याचा आस्वाद घेता येणार आहे. या लेखकांनी आपले लेखन प्रकाशित करण्यास पाठवले. त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद.

      तसेच माझे जिवलग मित्र सुनील अवचार याने आपली रेखाटणे दिवाळी अंकासाठी पाठवली त्याबद्दल त्यांचे आभार. माझे दुसरे जिवलग मित्र विजयेंद्र पाटील यांनी त्यांच्या परसबागेतील नुकत्याच उगवलेल्या कमळाच्या फुलाचे छायाचित्र घेण्याची परवानगी दिली त्याबद्दल त्यांचे आभार. आनागामी यांनीही छायाचित्र घेण्याची परवानगी दिली त्याबद्दल त्यांचे आभार.रसिक वाचक या अंकाचे स्वागत करतील ही अपेक्षा.   


----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------



अनुक्रमणिका


कविता 

         अनुसयाबाई फकिरा इंगळे, किशोर घोरपडे, शशिकांत हिंगोणेकर, मधुचंद्र भुसारे, वेणुप्रशांत, डॉ.मिलिंद विनायक बागुल, सुनील लोणकर, कैलास भाले, महेंद्र गायकवाड, उत्तम बावस्कर, प्रशांत वंजारे , सुरेश  साबळे,  अक्षय घोरपडे, संजय भानुदास इंगळे, सुनील अवचार, गणेश रघुनाथ राऊत, दिनेश मुडे.

कथा 

        रवीन्द्र पांढरे, आत्माराम गोडबोले, सचिन व्ही.काळे.

चित्रपट गीत समीक्षा

                       डॉ.अमृत खाडपे .   


                           
©Aanagami




----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------



कविता

©Sunil Awchar

दिवाळी आणि भाऊबीज

दिवाळी सण 

कधी येईल बिचारा              

बंधुले ओवायाले           

सण नहीं दूसरा                

सासू आत्याबाई पाया

लागते घाई घाई         

वर्षाची दिवाळी वाट

पाहये  मायबाई                     

सासू आत्याबाई                       

पाया लागते बागात

दिवाळीचे मूळ भाऊ

चालले रागात ३॥      

दिवाळीच्या दिवशी

माझ्या ताटात मोती

ओवाळ्याले  जाते                           

राणी भावजयचे  पती ४॥                 

भाऊबीजेच्या दिवशी

भाऊ ओवाळते तुला           

तुझ्या कमरेचा शेला

त्याची चोळी शिव मला ॥५             

                   -कवयित्री अनुसयाबाई फकिरा इंगळे.

🍁🍁🍁


पोबारा     
                                           
काळोखाची धास्ती                            
म्हणूनच सूर्याबरोबर दोस्ती केली
त्यावर भर टाकून मी
बेफिकर – निर्धास्त.

दूरवर काळोखी सळसळीचा
तोच तो भास
बघतो तर
सूर्यानेच पोबारा केला.

          -किशोर घोरपडे.

🍁🍁🍁

सजगच

मी कविता लिहितो

तेव्हा अंतर्बाह्य जागाच असतो

तसा हा काळही

मला झोपू देत नाहीय 

कालही काळ 

छलदायी होता

आजही आहेच

उद्याही अधिकच 

रक्ताळलेला असेलच

कविताही

हे सारे अनुभवते आहेय
म्हणून तीही मला 

स्वस्थ बसू देत नाहीय 

अंतर्बाह्य कविताही
सजगच झालीय आजकाल. 

          -शशिकांत हिंगोणेकर. 

🍁🍁🍁
©Sunil Awchar
                                                                                                                    

भूक गझल

भाकरीवर त्यांच्या तुपाची धार होती                         

भूक आमची उंबरठ्यापार होती.

ताटात होते नाचत नाना पंचपक्वान्न

पिठास मिठाची मारामार होती.

रोज महालात झडती जेवणाच्या पार्ट्या

गरिबांची भूक कुठे संपावर होती.

त्यांची निघालीत लफडी चव्हाट्यावर

त्यांची ती वासना धुवांधार होती.

आमचे कनेक्शन केव्हाच काटलेले

आश्वासनांची आरोळी कव्हरक्षेत्रापार होती.

पोटावर मारलेले, पाठीवर मारलेले

उमटल्या वळांची खूण निळीशार होती.

खूप सोसले, दुःखास मी थोडे तासले

वेदनेच्या आरोळीत थोडी एल्गार होती.

                                 - मधुचंद्र भुसारे.

🍁🍁🍁

गझल

सुखाच्या सुगीवर झडप पाखरांची 
जखम मात्र रक्ताळली भावनांची

दिली मूठमाती सुखाला सुखाने
अवस्था कळावी कशी दु:खितांची

सदा वास्तवाचा इथे दाह आहे
करपली पिके अंतरी कामनांची

जिथे गार हिरव्या सुशोभित डहाळ्या
लटकतात तेथे मढी जीवनांची

विकत न्याय मिळतो इथे खाटक्यांना
जरी रोज कत्तल उमलत्या कळ्यांची

सुरक्षित कुठे ना शहर राहिलेले
गिधाडे फिरकतात सदा वासनांची

लुटारू इथे आज मस्तीत आहे
मजा फार झाली खरी चोरट्यांची
          
                        - मधुचंद्र भुसारे.

🍁🍁🍁

व्हावे लागेल सूर्य

तरुणाईच्या ऐन उमेदीच्या काळात

खळखळून हसतोय

बेरोजगारीचा राक्षस

सरसकट खाजगीकरणातून

फोफावतेय

उन्मादी भांडवलशाही

आगीच्या लोळासारखी

सांप्रदायिक विषमतेचे विष

कालवले जातेय

राष्ट्रवादाच्या नावाखाली

ज्यांच्या वैचारिक दारिद्र्याची 

कीव यावी ते पुढारी

केवळ चिखलफेक करण्यात मग्न

सामान्य माणसा,

व्हावे लागेल तुला सूर्य

उद्याची पहाट पहायची असेल तर.

                         - वेणुप्रशांत. 

🍁🍁🍁


माणसं शोधावी लागतात तेव्हा.....

मी 

माणसं शोधत असतो 

माणुसकीचा गहिवर शोधणारी 

भाकरीला आकार देणारी 

अन् 

भाकरीला शेकणारी सुद्धा 

मी 

निश्चितच माणसं शोधत असतो 

जात धर्माच्या पलीकडची 

माझ्याकडची रोटी शेजारी देणारी 

अन् 

शेजार माणुसकी धर्म जपणारी जोपासणारी 

मी 

माणसातलाच माणूस शोधत असतो 

भाकरी रोटीशी इमान राखणारी 

अन् 

इमानाला जागणारी सुद्धा 

मी 

खरंच माणूस शोधतोय 

भारतीयत्वाची जाणीव असणारा 

देशाचा तिरंगा मजबूत हातात धरणारा 

अन् 

माणसाशी माणसाचचं नातं जोडणारा 

मी 

पेरत चाललोय माणूस आणि इमान 

पीक येईल तेव्हा येईल 

मी 

आशावादी राहील माणूसच माणसाला जागवेल तेव्हा....

                              - डॉ.मिलिंद विनायक बागुल. 

🍁🍁🍁


शहारुन जातो  मीही  

वर्षाकाठी, दसरा दिवाळीला घराच्या भिंती, अडगळीतल्या सामानावरील साचलेली धूळ, जळमटे साफसुफ करताना

अगदी सराईतपणे तिच्या हाताचा स्पर्श

जेव्हा फिरू लागतो अलगद

एकेक वस्तूवरून, सामानावरून..

तेव्हा,

त्या निर्जिव वस्तूही, चकाचक होऊन बोलू लागतात माझ्याशी..

दिवगंत आईचा फोटो छातीशी घट्ट धरून  साफ करून परत भिंतीवर लटकवताना शहारून जातो क्षणभर मीही...

घरालाही हवा असतो स्पर्श  आपुलकीचा, मायेचा

मनाच्या कोपऱ्यात ही दडलेली, साचलेली असतात जी काही किल्मिशे..

अंतरंगाच्या खिडक्या, दरवाजे सताड ऊघडे होतात यावेळी

साफसफाई निमित्ताने ऊजळतो जो भूतकाळ,

होते जी पडताळणी

तो एक मागोवा असतो, विसावा असतो

दमभागल्या आयुष्यासाठी..!

                     - सुनील लोणकर.

🍁🍁🍁



ओठावर हलकं हसू ठेवून

ओठावर हलकं हसू ठेवून
मधुर वाणीने बोलणाऱ्या तुमच्या
सदा प्रसन्न चेहऱ्यामागे दडलेले असतात तुमचेच कितीतरी बेरहम क्रूर चेहरे

आणि लटकेच आशीर्वादासाठी उंचावलेल्या तुमच्या दोन हाता व्यतिरिक्त 
चाकू, सुरे तलवारी, भाले ,बरची ,त्रिशूल ,बिचवा साई आणि खंजीर घेऊन उतरतात रस्त्यावर तुमचेच अगणित अदृश्य हात

किती आश्चर्य!

 फुगवून फुगवून दिसणार तुमचं ते 
अक्राळर विक्राळ रूप 

अनेक चेहरे तुम्हाला 
तसेच अनेक हात 

एकच धड
आणि एकच गुदद्वार.

 युगान युगापासून तुम्ही कापणी करत

 घर ,गाव, शहर, राज्य ,देश आणि जग
 तुडवित आलात

 तुमच्या वाटेत माणूस पेरा करताना
 येशू सुळावर चढला

 गोतमाने राजपाट त्यागला 
आणि मोहम्मद मक्केतून बहिष्कृत झाला तुमच्या खंडणीसाठी.

 खरं म्हणजे 

रात्री झोपतो 
तसेच सकाळी उठावे 

आणि जेवढी भूक तेवढीच भाकर हवी होती आम्हाला 
तर मग तुम्ही एवढे अगतीक कसे झालात?

मला तर तुमची दयाच येते
 कारण हे विश्व आहे त्यापेक्षाही अधिकच विस्तारत आहे

 आणि तुमच्या तर खूप मर्यादा आहे
 खंडणी खोरांनो.
                
                     - कैलास भाले.
🍁🍁🍁

कोळसा

अरे ! तुम्ही 
अंधाराच्या भितीने
अध्यात्मता बहाल केली
मी अद्यापही पृथ्वीच्या पोटात 
काळा कोळसा होऊन जगतो.                                                        

                - महेंद्र गायकवाड.    
🍁🍁🍁                                                                                                 
© Aanagami
                                   

इस्कोट

बांधावर गुडघे मिठी घालून 
बसलेला शेतकरी बाप 
त्याची शून्यात नजर 
डोळ्यान पाहिलेली हिरवी सपनं
पुराच्या पाण्यासोबत वाहून गेलेली
पीकपाणी, गुरंढोरं, घरदार 
सारं व्हत्याच नव्हत झालं !
पांढऱ्या कावळ्यांनी वांझोटी 
अस्वासनं फेकली त्यांच्या तोंडावर 
अस्मानी संकटामुळे 
कंबर मोडलेला शेतकरी बाप 
आता पुन्हा कवा उभा राहील?
त्याच्या दुखाचा ओला दांड
वाहतच राहील अव्याहत !

           - उत्तम बावस्कर. 
🍁🍁🍁

दिशा 

ते असतात 
ठार आंधळे 
काळोखाचे उपासक 

त्यांना ठेवायचा असतो उजेड दाबून 
व्यवस्थेच्या चिरेबंद खोलीत 

त्यांच्या दिशांना 
नसतात कुठलेही संदर्भ 

त्यांना घालायचे असतात 
तर्कविहीन घोळ 
उठवायचे असतात 
गैरसमजाचे लोळ 

म्हणूनच 
ते नाकारत असतात आपली 
सूर्योन्मुखी दिशा 

        -प्रशांत वंजारे.
🍁🍁🍁

कविता वाचून मरत राहू....

या वाटेला वळण नाही 
या शब्दाना गाळण नाही 
हा स्वप्नांचा हरवलेला प्रदेश 
आणि सत्तेचा निरंकुश जाळ
भाद्रपदाचं अलौकिकत्व सांगणारं तुझं हे संतमहात्म्य
बॉम्बवर्षावात तडफडून उध्वस्त झालेली ही घरं
माणुसकीच्या जाहीरनाम्याची घरभर पसरलेली रद्दी
हे चक्रधरा !
लगाम घाल आकाशात उधळणाऱ्या तुझ्या इच्छांच्या श्वापदांना 
अन्यथा 
आम्ही शायरीसाठी पेटवलेल्या शमेसारखे जळत राहू 
कविता वाचून मरत राहू......
                             -अक्षय घोरपडे .
🍁🍁🍁

बाप

व्यवस्थेच्या असंख्य भिंती
जीवन जगण्यासाठी असह्य, 
अंगातून निघणाऱ्या जाळांसह 
घामातून निथळणाऱ्या जीवनाला 
आकार देण्यासाठी धडपडणारा 
बाप-

रात्रंदिन गावभर 
हिरवी स्वप्न अंथरताना, 
मनांचा तळ शोधत 
प्रसंगी व्यवस्थेशी 
दोन हात करण्याची 
तयारी ठेवणारा 
बाप-

सकस सांस्कृतिक दृष्टीने 
बदलविण्यासाठी दिशांचे संदर्भ 
पुढचे पाऊल पुढेच टाकणाऱ्या बापाच्या 
आभाळभर स्वप्नांना देण्यासाठी आकार 
आता झालेच पाहिजे सज्ज 
संघटितपणे.......
संघटितपणे....
संघटितपणे......

                    -सुरेश साबळे.
🍁🍁🍁

स्ट्रीट पेंटर

तो काळ्या कलरभरल्या ब्रशने काय रंगवतोय?

माणूस!

हां हां माणूस-

निश्चितच माणूस !

अरे ss अरे ss

या चित्रातील माणसाची बुबुळे

कोणत्या गरम लोखंडी सळ्यांनी काढली असतील ?

याचा काय अर्थ?

पेंटरला उद्याच भविष्य दिसतंय !

                     -    सुनील अवचार.

🍁🍁🍁


नैतिक / अनैतिक

 जेंव्हा केंव्हा

चित्रकार, कवी, लेखक, संगीतकार

एका झेंड्याखाली येतात

स्वतःचा विवेक गहाण ठेवून

तेंव्हा आपण समजून घ्यायचे की,

आता वेळ आली आहे.....

सर्वांनी एकत्र चिंता करायची......

                 -सुनील अवचार.

🍁🍁🍁


चाहूल ऋतुराजाची

अवचित येते धुंद वादळास  उधाण ॥
स्वच्छंद पाऊसही घाली भूवरी थैमान ॥१ ॥

वादळ वारा पाऊस धारा मांडतात पळभर उच्छाद ॥
होऊनी तृप्त वसुंधरा तप्त मरुतही वाहतो आल्हाद ॥ २ ॥
                               
होता आगमन श्रावणाचे सुरू असते वरुणाचे  येणे जाणे ॥ 
वाटते बहाल केले वसुंधरेला निसर्गाने हिरवे लेणे ॥३ ॥
           
बालकांना येते  उधाण वृद्धांमध्ये येतो त्राण ॥ 
गुणगुण्यात सृष्टीचे गाणे वसुंधरा होते रममाण ॥ ४ ॥

चाहूल लागता थंडीची म्हणती सर्व आला हिवाळा ॥
असते थंडी गुलाबी वृक्षांस येते  अवकळा ॥ ५ ॥
                                 
होते नाहीशी वृक्षांची ही जीवघेणी अवकळा ॥
निसर्ग फिरवितो कांडी जादूची करून बहाल उन्हाळा  ॥६ ॥    

निसर्गासम ममता न करे कुणी चराचरावर॥ 
कृपादृष्टी निस्वार्थ असे सदैव पृथ्वीवर ॥ ७ ॥                         

                               -संजय भानुदास इंगळे.
🍁🍁🍁


जगण्याचा ज्वलंत पाढा'


वीटभट्टीवर थापलेल्या वीटेखाली
बाराखडीची एकेक अक्षरं 
दफन होत असतांना 
'अशफाक'
धुरा आडून पाहतोय 
लांब वरची शाळा 
मातीच्या लगद्यात 
तुडवत जातोय 
जगण्याचा ज्वलंत पाढा .

भाकरीच्या सोयीसाठी 
बापानं
बळजबरीनं ऊसतोडीवर आणलेली 
'शेहनाज'
भरल्या डोळ्यांनी 
मनात आठवत राहते
'ताराच्या शाळेचं गाणं'
स्वप्नांची भाकर करपली तरीही,
मांडत नाही 
कोणतंच वास्तव गाऱ्हाणं .

जळून चाललंय उरलं-सुरलं बालपण
खुरगटून गेलीय अक्षरपेरणी
यांच्या भुकेला शिवली नाही
कुठलीच इयत्ता 
कोणतीच उजळणी.

वाडी-वस्तीवरचा हा भयाण
काळोख
जाळत राहतोय कोवळी पानं..
फुलण्याआधीच खुडल्या जातंय
अंकुरणारं नवं गाणं..

परिस्थितीचा हा भयाण सुरुंग 
उधळून लावतोय 
हे उमलणारं निरागसपण...
'पोरा,तूच सांग
कोणत्या नकाशात शोधू
तुझं हरवलेलं बालपण??'

             -गणेश रघुनाथ राऊत.

🍁🍁🍁

सिंगल कॉलम आयुष्य.....

रोजंदारीचे
ओझे 
उचलताना...
उमेदीच्या दिवसाचे महत्त्व कधी कळालेच नाही.
सूर्य
माथ्यावर 
आल्यावर भान आलं...
वळून 
पाहिले असता
सावली ही दिशेनाशी झाली ..
वृत्तपात्राच्या
पानावर
ब्रेकिग न्यूज देता देता
आयुष्य
 सिंगल कॉलम मध्ये
संकुचित 
होऊन बसलं...

              -दिनेश मुडे.
🍁🍁🍁

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------






' लघुत्तम कथा '

                                                        (1)

     ' पिवळं कारड '

     " का ऽ वं शालन, हा एवढा मोठा बागायतदार कंटोरच्या दुकानात आपल्या पिवळ्या कारडावाल्या लोकाहिच्या रांगित कसा? येच्याकडे कुठून अन कसंकाय आलं माय पिवळं  

कारड ".

     " तुल्हे ठाऊक नही कां बह्ये ".

     " नही माय ".

     " आवं माय तेचा पुतन्या झेडपीत निवडून नही आला कां माघंल्या साली ".

     " आसं हाये कां ! "

                                                         (2)

   ' समाजभूषण '

     शह्यरातल्या सरकारी नवकरीत दर मह्यन्याले पगारापेक्षा कैकपट काळंधन कमावून तो कोट्याधीश झाला.

     गावाकडे समाजमंदिर बांध्याले तेन्हं लाखानं देणगी देल्ही. समाजाच्या मेळाव्यात समाजानं तेचा ' समाजभूषण ' म्हणून गौरव केला.

                               - रवींद्र पांढरे.

🍁🍁🍁

कथा

ओव्हरटेक

      डोसक्यावर काळेकुट्ट टांगते ढग. समद्या शिवारावर काजळ शिंपडल्यासारखं वाटत व्हतं .काळोख दाटून आला व्हता .मध्येच विजांची सळसळ. मेघांचा गडगडाट. कानठळ्या बसणारे आवाज. पाऊस कधी ईल ह्याचा नेम नाही.

       आसं मनाय उशिरा पाऊस सुरू झाला. सोबतीनं विजांचा थयथयाट.पावसाच्या कचाट्यात समदं शिवार सापडलं. झाडाजुडप डोंगर दिशेने असे झाले. गाडीच्या टपावर खडे पडावे तसा पाऊस आदळत  व्हता .पावसाच्या ओल्याचिंब धुक्यात समदं  एकजीव झालं. व्हत . त्यातूनही वाट काढत जो तो आपल्या मुक्कामाकडे निघाला व्हता .

         काळी कुळकुळीत सडक अनेक मोटारीना  अंगावर घेऊन धावत व्हती. काराटेंपो, ट्रका ह्येंची  रांग लागली व्हती .समद्दनं  आपल्या गाड्यांचे हेडलाईट, इंडिकेटर्स लावले व्हते. तेवढ्याच काय तो त्या अंधारात दिलासा. त्यांचं चमचमणं जिवाला सुखवित व्हतं . व्हायपर्सची स्पीड वाढली व्हती. म्हागचा पुढचा अंदाज घेत ड्रायव्हर आपल्या पद्धतीने गाड्या चालवत व्हंते. झाडं झुडपं थरथरत व्हंते .त्यात मध्येच विजंचं पातं सळसळायचं अन काळीज लख्खकन करायचं

         मग एक / दीड तासानंतर पावसानं मारा बंद केला. आन् रोडवरच्या गाड्या ठळक दिसू लागल्या. संमद्या गाड्या स्वच्छ धुऊन निघाल्या व्हत्या. एकदम चकचकीत. रंगीबेरंगी पाखराची पंखवीत तशा गाड्या चमकत व्हंत्या. त्येंच काच चकाकत व्हतेअनेक गाड्यांनी आपल्या काचेवरपाठीवरपोटावर देवाधर्माचे, वर्गाचे, पंथाचे, प्रतीकं, आकडे, चिन्ह, शब्द ,विचार कोरले व्हते.

 ‘स्वामीरथ

सोन्याची जेजुरी

परब्रम्हलिंग भजे पांडुरंगम्

 ‘रौद्रशंभू

जयजय रघुवीर समर्थ

जय श्रीकृष्णा

होय हिंदूच

जय मल्हार

जाणता राजा

‘Jesus +’

भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे

ओम साईराम

‘786’

तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार

कुणी आवडला तर वाट दाखविन, नडला तर जात दाखवीन

ग्रेट मराठा

 ‘मेरा भारत महान

        असं काईबाई गाड्यांवर लिहिलेलं दिसत व्हतं. प्रा.डॉ. सुरज चांदमारे यांची गाडीही यामध्ये व्हती. ड्रायव्हिंग करत करत ते हे सर्व वाचत व्हते. त्यांनी आपल्या गाडीच्या मागच्या काचेवर रेडियमचं निळ अशोकचक्र चिटकवलं व्हतं .

         आता अशोकचक्र म्हटल्यावर आपण भारतीय असल्याची ती खरी ओळख आहे. पण महाराष्ट्रातील ती नवबौद्धांची ओळख ठरली आहे. एका नजरेत ओळखलं जायचं की ही जयभीमवाल्यांची गाडी हाय मनून.आसं असलं तरी प्रा. सुरज चांदमारे गाडीवर अशोकचक्र चिटकवून साऱ्या महाराष्ट्रभर प्रबोधनानिमित्त फिरत व्हते.

      अशोकचक्र चिटकवण्यात त्यांना वावगं असं काही वाटत नव्हतं. प्रत्येकजन आपला धर्म ,पंथ, वर्ग आपापल्या पद्धतीनं अनुसरतो. आपण कोणत्या धर्माचे आहोत, कोणत्या विचारधारेचे अनुयायी आहोत, हे जमेल त्या ठिकाणी, जमेल तेवढे अधोरेखित करण्याचा जो तो प्रयत्न करतो.

            घराचे दरवाजे, भिंती, मोटर- बाईक, कार यावर आपापल्या धर्माचे, देवदेवता, चिन्हे, प्रतिकं, शब्द, विचार अनेकजण डकवित असतात. मनात धर्म ठेवण्यापेक्षा आता तो जास्त जनातच दाखवण्याची चढाओढ लागली आहे.मी असा धर्माभिमानी आहे हे पुन्हा पुन्हा गिरविलं जातं. आणि याचे लाभ ही होतात. ख्रिश्चन, हिंदू, जैन ,मुस्लीम यांचं तर हे कवचंच आहे .याच्या उलट नवबौद्धांचं आहे. त्यांनी असं काही लिहिलं तर ते मान्य होत नाही. त्यांना व्देषाच्या विषारी डोहात बुडवलं जातं. मत्सराचे गतीरोधक जागोजागी उभे केले जातात. हाटकून भांडण काढलं जातं. चुकून टाचणी तरी टोचली तर लगेच तलवार उपसली जाते ...

     ... आताबी तसंच झालं. डॉ. सुरज चांदमारे यांच्या गाडीसमोर होय हिंदूचअसं काचेवर भगव्या रंगानं लिहिलेली गाडी चालली व्हती. तिचा स्पीड अतिशय कमी व्हता. ना ती स्वतः स्पीडनं जात व्हती ना दुसऱ्याला जाऊ देत व्हती. आम्ही कसंही चालतो तरी आम्हाला कोणी बोलू शकत नाही असा त्यांचा अविर्भाव व्हता .पाच / दहा मिनिटं झाली पण गाडीची गती काही वाढत नव्हती. आन् प्रा. चांदमारेंना तर जायची घाई व्हती. त्येंला एका ठिकाणी वेळेत  पोहचायचं व्हतं. शेवटी त्येंनी हॉर्न वाजवून साईड मागितली .पण गाडीतले पोरं काही दात देत नव्हते. त्येंचं हासणं, खिदळणं चालू व्हतं.

        शेवटी सुरज चांदमारेंनी थोडा रुंद रस्ता दिसताच आपल्या गाडीची स्पीड वाढवली होय हिंदूचला ओव्हरटेककेलं . अन् बघता बघता तसल्या पावसाळी हवेत ठिणकी पडली.

      ‘माईला सद्या, जयभीमवाल्याची गाडी दिसाल्याय...

कस्याऊन ?’

माईला तुझ्य, तुला अशोकचक्र दिसंनाय का?’

ड्रायव्हर सीटच्या बरोबर म्हागं बसलेला दणकट पोरगा बोलला .

    ‘अशोकचक्र आसलं मनून काय झालं? जयभीमवाल्यांचीच आसलं कस्यावरून?’ ड्रायव्हींग करणाऱ्यानं उगंच शंका घेतली.

    ‘माईला तुज्या जयभीमवाल्यासिवी कोण लावतंया आशोकचक्र...

   ‘मंग आता रं?’ दुसरेच दोन पोरं प्रश्नार्थक बोलले.

 ‘गाडी पुडी घे, माईला आपणाला ओव्हरटेक’ ?’

त्या पोरांना त्यांच्या गाडीला ओव्हरटेक करणं अपमानित वाटलंच. पर एक नव- बौद्ध आपणाला ओव्हरटेकयाचा संताप जास्त आला. त्येंला ह्ये सहनच झालं नाही. त्येंचा तो म्होरक्या तर सारखा फुरफुरत व्हता.

      ‘ओव्हरटेकमग ते गाडीचं असो की राजकारणातलं, साहित्यातलं असो सामाजिक क्षेत्रातलं, खेळातलं असो की सांस्कृतिक क्षेत्रातलं‌. एक दलित आपणाला ओव्हरटेक करतोय ही कल्पनाच डोकं तडकवणारी. यातून कोणीही सुटलं नाही. पुरोगामीपणाचा आव आणणाऱ्यांनासुद्धा हे चालत नाही. बाकीच्यांची तर कथाच निराळी. खासगीत समदी चर्चा जातीला केंद्रस्थानी ठेवून. समदं जोखणं जातीला धरूनच. मंग तुम्ही स्वतःला सोळा आणे सिद्ध केलं तरी.

    ‘ ... मी अशा प्रवृत्तीचा धिक्कार करतो हा एक प्रकारे आंबेडकरी विचारांना दाबण्याचा प्रकार आहे...एक ‘... प्रत्येकाला आपापल्या धर्माप्रमाणे राहण्याचं स्वातंत्र्य आहे. आपल्या घरावर, गाडीवर, इच्छा असेल तर आपल्या धर्माचे चिन्ह, प्रतीक आपण लावू शकतो. त्याला कोणी रोखू शकत नाही. पण काही धर्मियांना ही केवळ आपलीच मक्तेदारी वाटते...दोन

      ‘समूहाला मन नसतं तर ताकद असतेसमूहाकडे विचार नसतो तर शक्ती असते. आणि या शक्तीच्या जोरावर  ते इतरांची प्रतीकं पुसण्याचा प्रयत्न करतात. तसाच प्रकार प्रा. चांदमारे सरांच्या बाबतीत झाला  आहे. आणि तो अतिशय निंदनीय आहे...तीन.

      प्रा सुरज चांदमारे यांच्या गाडीवर झालेला हल्ल्याचा निषेधार्थ शहरातील एका महाविद्यालयाल निषेध सभा आयोजित केली व्हती. प्राध्यापक, वकील, कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. स्वतः प्रा. चांदमारे सुद्धा हजर व्हते. त्यांनी पुन्हा एकदा तो प्रसंग सभेला सांगितला...

.    ... ‘होय हिंदूचचक्क गाड्या गाडीच्या समोर आणून उभी केली अन् त्या चार-पाच पोरांनी त्येंच्या गाडीला घेरलं. काचंवर मुठी आदळून लागल्या. एकानं तर चक्क दरवाजालाच हात घातला.

     ‘ उत्तर खाली...

       ‘भोसडीच्या उतर लवकरते चारपाच चेहरे क्रोधाने बघत व्हते.

     त्यातला एकाचं लक्ष पुस्तकावर गेलं. चारपाच पुस्तकं व्हती. एकावर बाबासाहेबाचं चित्र व्हतं, ते पाहून तर ते जास्तच बिथरले.

       ‘बाहेर निघ. का ओढून काढू...?’ ती पोरं त्येंला आव्हान देत व्हती .

      संकटाशी सामना कसा करावा? असं भाषणात सांगणारा प्राध्यापक. तथागतांचं , बाबासाहेबांचं तत्त्वज्ञान सांगणारा प्राध्यापक या प्रसंगातून बाहेर कसं पडावां ह्येचा विचार करीत व्हता. त्येलाही राग येत व्हता. पण प्रसंगाचं गांभीर्य ओळखून त्येनं राग आवरला. आन् मोठ्या धीरानं, आत्मविश्वासानं बाहेर पडला.

 ‘बोला काय झालं. काय प्रॉब्लेम आहे?’ ‘बोला काय ऑऽऽऽ. आंगावर चिकूल बग. डोळे बंद करून गाडी चालवितोस? ऑऽऽऽ.

     त्यातल्या दणकट पोरांना गोंदलेल्या दंडावर उडालेली चिखलाचे थेंब दाखविले

       Sorry I am really very very sorry

        उडाला असेल चिखल पण मला जरा घाई होती

         प्राध्यापक चांदमऱ्यांनी दिलगिरी व्यक्त केली नम्रपणे सॉरी बोलले. पण ती पोरं ऐकण्याचा मनस्थितीत नव्हती. तारुण्याचा कैफ मदिरेची झिंग त्यांना ढुसण्या देत व्हती. त्यामुळे  त्यांचा तोल चालला होता

        ' ss सॉरी काय ss' असं म्हणून त्या दणकट पोरांन ढकलण्याचा प्रयत्न केला.

          ' जाड्या, हात लावशील तर बघ...' चांदमारे रागाने बोलले.

           'काय करशील ? ss'  तो पोरगा निमित्त शोधत होता.

           मग मात्र प्राध्यापकाचा आवाज चढला आणि तो बोलला 'चल गाडी बाजूला घे '

         ' नाही घेतली तर...' पोरांनी भांडण उकरून काढलं.

          ठीक आहे म्हणून सुरत चांदमारे गाडीत बसले. गाडी स्टार्ट केली आणि रिव्हर्स घेऊन ते पुढे निघणार तेवढ्यात एका पोरांना हातातली दारूची बाटली मागच्या काचेवर मारली. आणि एका क्षणात गाडीची काच फुटली. अशोक चक्राचे तुकडे झाले. आरे निखळून पडले. प्राध्यापक सुरज चांदमारे यांनी पाहिलं तेव्हा त्यांच शरीर संतापाने उकळलं. डोक्यात रक्त उतरलं. ते उसळी मारून बाहेर आलं. आणि त्या पोराच्या कानावर खन्नकन वाजवली. आपण काय करतो याचं भानही राहिलं नाही. अंगातल सारा लावा त्या पोरावर ओतला. पोरगा  लोळागोळा झाला. खूप वेळानंतर जेव्हा ते भानावर आले. तेव्हा सारा ट्रॅफिक ठप्प झालं होतं.

                                                                        -आत्माराम गोडबोले.

🍁🍁🍁



कथा

बाप...बाप असतो.....!

पंच्याहत्तर वर्षाचे भास्करराव आज शुद्धीवर आले होते. गेल्या तीन दिवसापासून आयसीयु मध्ये अॅडमिट होते. सकाळी फिरायला जाणे ही त्यांची रोजची सवय. असेच तीन दिवसापूर्वी सकाळी फिरायला गेले असतांना भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली होती. त्यातच मेंदूला जबर मार लागल्याने ते हॉस्पिटल मध्ये अॅडमिट होते. मेंदूमध्ये प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने त्यांचे ऑपरेशन करणे गरजेचे होते. परंतू ते शुद्धीवर येणे आवश्यक होते. त्या शिवाय ऑपरेशन करणे शक्य नाही असे डॉक्टरांचे म्हणणे होते. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतर आज त्यांना शुद्ध आली होती. लवकरात लवकर त्यांचे ऑपरेशन करणे गरजेचे होते. नसता परत शुद्ध हरपून ते कोमात जाण्याची शक्यता होती.

म्हणून डॉक्टर गडबड करत होते. डॉक्टरांनी त्यांच्या मुलाला आयसीयुमध्ये बोलावून घेतले. डॉक्टर मुलाला सांगत होते. बाबांच्या मेंदूला जबर मार लागल्याने रक्तस्त्राव जास्त झाला आहे. तात्पुरता आपण तो बंद केला आहे. परंतू ऑपरेशन केल्याशिवाय पर्याय नाही. त्याशिवाय रक्तस्त्राव पूर्णपणे बंद होऊ शकणार नाही. ऑपरेशन केले नाही तर ते कायमचे पॅरलाईज होऊ शकतात किंवा कायमचे कोमात जाऊ शकतात. ऑपरेशनचा खर्च साधारण पाच लाख येईल. काय करायचे ते लवकर ठरवा.असे त्यांनी सुमितला सांगितले. वास्तविक ही गोष्ट भास्कररावांसमोर बोलणे उचित नव्हते. ते नेमकेच शुद्धीवर आले होते. पण डॉक्टरांनी वेळ जाऊ नये. म्हणून सुमितला आयसीयुमध्ये बोलावून सर्व परिस्थिती समजावून सांगितली. सुमितच्या डोळ्यात पाणी तरळत होते. एक तासात निर्णय सांगतो. म्हणून तो बाहेर निघून गेला.

डॉक्टर व सुमितमधील बोलणे भास्कररावांनी नेमके ऐकले. त्यांच्या ही डोळ्यात पाणी आले. डॉक्टर त्यांना तपासून निघण्यासाठी वळले. तेवढ्यात भास्कररावांनी डॉक्टरांचा हात धरला आणि हातातल्या सलाईनच्या नळी सह डॉक्टरांना हात जोडून कापऱ्या आवजात ते बोलू लागले. डॉक्टर साहेब मला शुद्धीवर आणल्याबद्दल आपले धन्यवाद. माझी तुम्हांला एक विनंती आहे आणि ती विनंती तुम्ही मान्य करावी. ही माझी शेवटची इच्छा समजा. डॉक्टर साहेब  तुम्ही माझ्या मुलाला जे काही सांगितले ते सगळे मी ऐकले. माझे आता वय झाले आहे. आजपर्यंत माझे सगळे आयुष्य कष्टातं गेले. पण सगळ्यांचे करता-करता आयुष्य आनंदात जगलो. कधी कशाची तक्रार केली नाही. हे सगळे करतांना कर्जाचा डोंगर झाला. तो डोंगर उतरता-उतरता कधी इथं पर्यंत पोहचलो ते लक्षात ही आले नाही. या कर्जाच्या डोंगरामुळे माझ्या कुटूंबासाठी मला हवे तसे काही करता आले नाही. माझ्या लेकरांचा हट्ट कधी पुरवता आला नाही. मीठ भाकरी खाऊन माझी लेकरे शिकली. कधी कसला हट्ट त्यांनी केला नाही. पोरगा लहान वयात काम करून शिकला. कधी कशाची मागणी त्याने केली नाही. चांगला शिकून आता नोकरीला लागला आहे. माझ्याकडे लक्ष ही देतो. माझी, त्याच्या आईची काळजी ही घेतो. आता नव्याने त्याचा संसार ही सुरु झाला आहे. पोरगी ही तिच्या घरी सुखी आहे. तिने सुद्धा कधी कसला हट्ट केला नाही. डॉक्टर साहेब माझे सगळे आयुष्य कर्ज फेडण्यात गेले. आता माझ्या ऑपरेशनसाठी माझ्या पोराला पण कर्ज काढावे लागेल. माझ्यासाठी तो कसला ही विचार न करता ते ही काढेल. मला माहीत आहे. पण डॉक्टर साहेब माझे आयुष्य जसे नुसते कर्ज फेडण्यात गेले. तसे त्याचे नको जायला. लहानपणापासून तो कष्ट करत आलायं. आताशी कुठे त्याचा सोन्या सारखा संसार सुरु झालायं. मी जे कर्ज फेडताना भोगले. माझ्यासाठी माझ्या लेकराला भोगायला नका लावू. उलट मला सुट्टी द्या. इथे दवाखान्यात जीव ठेवण्यापेक्षा माझ्या घरात, माझ्या लोकांमध्ये शेवटचा श्वास घेतला. तर जीव कशात गुंतणार नाही. जे घर घेण्यासाठी व बांधण्यासाठी कर्ज घेतले. ते फेडण्यासाठी माझ्या लेकरांच्या इच्छा, स्वप्नं पूर्ण करू शकलो नाही. त्या घरात मला माझा देह ठेवू द्या. माझे ऑपरेशन करू नका. माझ्या लेकराला माझ्यासाठी आयुष्यभर कर्ज फेडायला नका लावू. जगू द्या त्याला आनंदाचे दोन दिवस. आता जगून तरी काय करू? असे अधू होऊन लेकाच्या जीवावर जगण्यापेक्षा देवा घरी गेलेले बरे. ही माझी शेवटची इच्छा समजा.

हे सर्व ऐकतांना डॉक्टरांच्या ही डोळ्यात पाणी आले. भास्कररावांचा हात धरून ते त्यांना म्हणाले, “बाबा काळजी करू नका तुमच्या मुलाला आयुष्यभर कर्ज फेडण्याची वेळ येणार नाही. शासनाने तुमच्यासाठी सोय उपलब्ध केली आहे. आपण शासकीय योजनेतून तुमचे ऑपरेशन करू. एक रुपया ही तुमच्या मुलाला कर्ज होणार नाही. काळजी करू नका सगळे चांगले होईल. मी सांगतो तुमच्या मुलाला काय करायचे ते चिंता करू नका.डॉक्टरांनी स्वत:चे डोळे पुसले आणि स्वत:शी पुटपुटले खरचं बाप.......बापच असतो.

                                                                      -सचिन व्ही.काळे.

🍁🍁🍁

 

 

©Sunil Awchar

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


चित्रपट गीत समीक्षा

" चंदन सा बदन,चंचल चितवन "

         गुजराती साहित्यकार गोवर्धनराम माधवराम त्रिपाठी द्वारा लिखित 'सरस्वतीचंद्र' ही एक प्रसिद्ध कादंबरी आहे.ही कादंबरी सन 1897 ते 1902 या 15 वर्षांच्या कालावधीत चार भागात प्रकाशित झाली. याच कादंबरीवर आधारीत ' सरस्वतीचंद्र ' हा हिंदी चित्रपट इ.स.1968 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा हिंदीतील शेवटचा कृष्ण-धवल चित्रपट होता. 19 व्या शतकातील भारतातील सरंजामशाही, उत्कट प्रेम, प्रेमाची विफलता, त्याग यांचे उत्कृष्ट चित्रण यात केले गेले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक गोविंद सरैया तर निर्माता विवेक होते.

             या चित्रपटातील 'चंदन सा बदन', 'छोड दे सारी दुनिया किसी के लिए ये मुनासिब नहीं आदमी के लिए' , 'हमने अपना सब कुछ खोया प्यार तेरा पाने को ', ' फूल तुम्हें भेजा है खत में फूल नहीं मेरा दिल हैं ', 'मैं तो भूल चली बाबुल का देस पिया का घर प्यारा लगे', 'सौ साल पहले की बात है', 'वादा हमसे किया दिल किसी को दिया' ही सर्वच गाणी कर्णमधुर होती. परंतु कल्याणजी- आनंदजी यांचे संगीत, इंदीवर यांचे गीत आणि मुकेश यांच्या मखमली आवाजातील 'चंदन सा बदन चंचल चितवन' हे मला आवडलेले नितांत सुंदर गीत. 

     मनीष व नूतन यांच्यावर हे गीत चित्रित केलेले आहे. या गीतात प्रियकराने आपल्या प्रेयसीचे इतके सुंदर वर्णन क्वचितच दुसऱ्या कुणी केलं असेल.

" चंदन सा बदन चंचल चितवन

धीरे से तेरा ये मुस्काना

मुझे दोष न देना जग वालों

हो जाऊं अगर मैं दीवाना "

             चंदनासारखी तुझी ही सुंदर काया,प्रेमानं ओथंबलेली तुझी ती नजर आणि कहर म्हणजे हळूवार हास्य पसरलेली तुझी ती मुखमुद्रा. तुझे हे घायाळ करणारे सुंदर रुप पाहून मी जर वेडा झालो तर यात मात्र माझा दोष नाही.

" ये काम कमान भवें तेरी

पलकों के किनारे कजरारे

माथे पर सिंदूरी सूरज

होंठों पर दहकते अंगारे

साया भी जो तेरा पड़ जाए

आबाद हो दिल का वीराना "

             तुझ्या भुवया कामदेवाच्या धनुष्या प्रमाणे दिसत आहेत.काजळ भरलेल्या तुझ्या काळ्याभोर पापण्यांच्या त्या कडा तर फारच सुंदर.तुझ्या कपाळावरील कुंकू म्हणजे आकाशात तळपणारा लालबुंद सूर्यच.तुझे ओठ हे रखरखत्या निखाऱ्यांपेक्षा काही कमी नाहीत.तुझी सावली जरी पडली तरी माझ्या ह्रृदयाचं वैराण वाळवंट हिरवेगार झाल्याशिवाय राहणार नाही.

" तन मी सुंदर मन भी सुंदर

तू सुंदरता की मूरत है

किसी और को शायद कम होगी

मुझे तेरी बहुत जरुरत है

पहले भी बहुत मैं तरसा हूं

तू और न मुझको तरसाना "  

             आपल्या सुंदर शरीरा प्रमाणे तुझे मन ही सुंदर आहे. मला तर तू सौंदर्याची देवीच वाटत आहे.कुणाला नसेल पण मला खरोखर तू हवी आहेस.मी या अगोदरही तुझ्यासाठी खूप व्याकुळ झालो होतो.आता तरी यातून माझी सुटका कर.

     या गितातील अभिनेता मनिष आणि अभिनेत्री नूतन यांचा विरह भावना व्यक्त करताना अभिनय लाजवाब आहे. शब्दांना बोलकं करणाऱ्या नरीमन इराणी यांच्या छायाचित्रणाला तर तोडच नाही.विरहाने व्याकुळ झालेल्या प्रियकराच्या आर्त स्वराला मुकेश यांच्या आवाजाने खरोखर न्याय दिला आहे.

             ' सरस्वतीचंद्र ' या चित्रपटाला 1969 चा सर्वोत्कृष्ट छायाचित्रणाचा राष्ट्रीय पुरस्कार नरिमन इराणी यांना तर सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा पुरस्कार कल्याणजी आनंदजी यांना मिळाला होता.फिल्म फेअरचा सर्वोत्कृष्ट संवाद पुरस्कार एस.अली रजा यांना मिळाला होता.1968 मध्ये हे गीत बिनाका गीतमालाच्या वार्षिक कार्यक्रमात पाचव्या क्रमांकावर होते. हे गीत ऐकल्यानंतर भूतकाळातील सुखद आठवणींच्या हिंदोळ्यावर झोके घेतल्यासारखे वाटते.

                                                                                             -डॉ.अमृत खाडपे.



©Sunil Awchar





 

६ टिप्पण्या:

  1. प्रज्ञेची मुळाक्षर हा ऑनलाइन दिवाळी अंक प्रकाशित करण्याचा आपला हा प्रयत्न नाविन्यपूर्ण असून या अंकातील साहित्य असंख्य वाचकांपर्यंत पोहोचेल यात शंकाच नाही

    उत्तर द्याहटवा
  2. खूप सुंदर अंक. अंकातील लेख व कविता विशेष भावले.

    उत्तर द्याहटवा
  3. कवितेचा प्रांत खूपच छान आहे. अभिनंदन सर

    उत्तर द्याहटवा

जागतिकीकरण आणि आदिवासी

  जागतिकीकरण आणि आदिवासी डॉ . अक्षय किशोर घोरपडे. ·        गोषवारा  (Abstract) :- १९९० नंतरचा कालखंड हा भारतीय समाज जीवनात फार मोठा सा...