बुधवार, २६ नोव्हेंबर, २०२५

'तो शेतमजुराचा पोरगा आहे.'

शालेय अभ्यासक्रमापासून दूर असलेला 'तो शेतमजुराचा पोरगा आहे.'


तो शेतमजुराचा पोरगा आहे - नामदेव कोळी                

 

जो नेहमीच प्रार्थनेला उशिरानं येतो

दीड पायावर उभा राहत

म्हणतो प्रतिज्ञा कशीबशी

खरं तर तो आवरून आलेला असतो

घाईत गोठ्यातली कामं

 

जो आठवड्यातून दोन-तीनदा

हमखास दांड्या मारतो शाळेला

त्याचा गृहपाठही नसतो कधीच पुरा

खरं तर त्याला जावं लागतं वावरात

घराला हातभार लागावा म्हणून

 

ज्याच्या सदऱ्यावर ओघळ असतील घामाचे

चड्डीला ठिगळं मागे वीतभर

कुबट वासही येत असेल कपड्यांचा

खरं तर त्याला शाळेतूनच जावं लागतं

मालकाच्या खळ्यात गणवेशासकट

 

ज्याच्या भेगाळलेल्या पायांत असेल

टाचा घासलेली चप्पल अथवा बूट फाटलेला

काट्यांची कुरपंही असतील बहुधा तळव्यांत

खरं तर अनवाणी पावलांनीच

भटकत असतो तो शिवारभर

 

जो नदीत मासे पकडतो सहज

सरपण जमवतो भर उन्हात

मध काढतो मधमाश्यांना हुसकावून

खरं तर तोंडपाठ आहे त्याला अख्खं जंगल

जीव-जनावरांची बोलीही

 

तो जेमतेम पास होईल

अथवा तुम्ही नापासही करू शकता त्याला

खरं तर वर्गातल्या पोरांपेक्षा तो फार गुणी आहे

त्याला कुठल्या व्यवस्थेत बसवायचं ते सांगा मास्तर

तो शेतमजुराचा पोरगा आहे.

 

'तो शेतमजुराचा पोरगा आहे' ही कविता नामदेव कोळी यांची असून नामदेव कोळी हे खानदेशातील महत्त्वाचे नवोदित कवी म्हणून उदयास येत आहेत. 'काळोखातल्या कविता' हा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित असून 'वाघूर' या दिवाळी अंकाचे संपादक म्हणूनही ते सर्वपरिचित आहेत.

नामदेव कोळी


'तो शेतमजुराचा पोरगा आहे' या कवितेत कवीने शेतमजुराच्या पोराच्या दैनंदिन जीवनाचे यथार्थ चित्रण केलेले आहे. भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. भारतातल्या कृषीव्यवस्थेचा व त्याच्या इतिहासाचा वारंवार गौरव केला जातो. येथील हवामान व त्यानुसार घेतल्या जाणाऱ्या पिकांची जैवविविधता अनुभवता भारत हा संपन्न कृषीप्रधान देश आहे हे वास्तव ठळक अधोरेखित होत जाते. हे खरे असले तरी भारतातल्या कृषीप्रधान व्यवस्थेचे वास्तव मात्र वेगळे आहे. भारतातल्या कृषीव्यवस्थेची चिकित्सा केली तर प्रामुख्याने तीन स्तर त्यात दिसून येतात. एक ज्यांच्याकडे भरपूर प्रमाणात (सुपीक अथवा नापीक) जमीन आहे असा एक वर्ग, दुसरा अल्पभूधारक, तिसरा शेतमजूर या तिन्ही स्तरातील शेतकऱ्याला विविध प्रश्नांना सामोरे जावे लागते. यातील कुठलाच स्तर हा पूर्णपणे सुखी नाही यातील आर्थिक हलाखीचा उतरता क्रम जर ठरवायचा असेल तर यात सर्वात शेवटी येतो तो शेतमजूर. तो भूमीहीन आहे. ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीची जमीन नाही आणि असेलच जमीन तर तीही अल्प बरड ज्यावर कुटुंबाची गुजराण होणार नाही. त्याची उपजीविका ही दुसऱ्याच्या शेतीवर अवलंबून असते. दुसऱ्या शेतकऱ्याने जर त्याला आपल्या शेतात मजूर म्हणून राबवले तरच त्याची गुजराण होऊ शकते. दुष्काळ ओला असो की सुका, शेतमालाला चांगला भाव असो की नसो या सर्वात मरण होते ते शेतमजुराचेच. ग्राम जीवनात शेतमजुराचे जीवन अत्यंत कष्टप्रद आहे. बारा महिन्यातील ठराविक सात-आठ महिन्याचेच काम त्याला मिळत असते. उरलेल्या काळात तो कामाच्या बाबतीत विस्थापित किया स्थलांतरित होतो किंबहुना बेरोजगार होतो, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

ग्रामसंस्कृतीचा विचार केला तर ग्रामव्यवस्था ही अलुतेदार, बलुतेदार व्यवस्थेवर अवलंबून असते. आजच्या आधुनिक काळात ही व्यवस्था मोडकळीस आलेली असली तरी ही व्यवस्था जेव्हा प्रभावी होती तेव्हा आणि आताही या व्यवस्थेत शेतमजुराचे स्थान निश्चित करता येत नाही. शेतमजूर हा कुठल्याही एका विशिष्ट जातीतून आलेला नसतो, ज्याच्याकडे शेती नाही आणि ज्याची उपजीविकाच शेतीवर अवलंबून असते तो म्हणजे शेतमजूर. अशी साधारण शेतमजुराविषयीची व्याख्या आपणास करता येते. शेतमजुरांची उपजीविका ही शेतीवर अवलंबून असल्याने शेतीतला हंगाम संपला की, शेतीप्रमाणेच शेतमजूर ही उघडा बोडखा होऊन जातो. त्यामुळे शेतमजुराच्या घरातील प्रत्येक सदस्याला कुटुंबासाठी हातभार लावावा लागतो. मूल वयात येण्याच्या आधीच शेतमजूर म्हणून कुठेतरी काम करत असते. घरातील प्रत्येक सदस्यांनी काम केले नाही तर कुटुंबाची उपजीविका कशी चालणार? कुटुंबाला आर्थिक हातभार कसा लागणार? दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई आणि खर्चाचा आर्थिक ताळमेळ लावण्यासाठी शेतमजुराच्या कुटुंबाला तारेवरची कसरत करावी लागते. शहरी भागाला लागून असलेल्या शेतमजुरासाठी कामाचे विविध पर्याय उपलब्ध होऊ शकतात, मात्र जो शहरापासून दूर आहे आणि गावातच ज्याचा संबंध अधिकचा आहे अशा शेतमजुरासाठी जगणे अधिक आव्हानित झालेले असते. आर्थिक कोंडमारी जणू काही त्याच्या पाचवीलाच पुजलेली असते. शेतमजुराचे कुटुंब हे दारिद्र्यरेषेखालची जीवन जगत असते. अशा शेतमजुराच्या उद्धारासाठी सरकारने विविध उपाययोजना आणल्या, त्यांच्या जीवनाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी या उपाययोजनांची मोठी मदत झाली. त्यामुळे शेतमजुराला आत्मभान आले, शेतमालकाकडून होणारी पिळवणूक त्याच्या लक्षात आली. कमी मजुरीत अधिक काम करून घेणाऱ्या शेतकऱ्यांशी त्याने असहकार पुकारला. आपल्या मागण्या हक्क आणि कामाचे तास याचा ताळमेळ शेतमजुरास लागल्याने आजच्या शेतीव्यवस्थेत तो महत्त्वाचा घटक झालेला आहे. एकंदर सर्व कृषीव्यवस्थेवर त्याचा प्रभाव पडला आहे. मोडकळीस आलेली शेतीव्यवस्था आणि शेतकऱ्याच्या होणाऱ्या आत्महत्यांचेही एक प्रमुख कारण म्हणून शेतमजूर आणि त्यांच्या व्यवहाराकडे पाहिले जाते आणि शेतमजुरांना आर्थिक संपन्न करणाऱ्या सरकारवरही त्याचे खापर फोडले जाते. शेतमजुराची बदललेली आर्थिक परिस्थिती आणि त्याचा बदललेला आर्थिक व्यवहार पाहता असा प्रश्न निर्माण होतो की, सरकारी योजनांवर जर शेतमजूर आर्थिक संपन्न झाला असता तर आजही शेतीमध्ये शेतमजूर उपजीविकेसाठी कामाला का जातो ? आणि आर्थिक संपन्न झालेला असेल तर आजच्या काळात शेतमजुरावर नामदेव कोळी यांनी अशा पद्धतीची कविता का ही लिहिली? किंवा का लिहावी ?

'तो शेतमजुराचा पोरगा आहे' सदर कविता ही नामदेव कोळी यांनी लिहिलेली असून या कवितेत त्यांनी शेतमजुराच्या मुलाच्या दैनंदिन जीवनाचे  वर्णन शाळेच्या पार्श्वभूमीवर केलेले आहे. शाळा जेथे अध्ययन अध्यापनाचे काम चालते, जिथे मुले शिकतात, भाषा व सामाजिक शास्त्रे अभ्यासतात, मोठी होतात सुसंस्कारित होऊन आदर्श नागरिक बनतात. ज्ञानार्जनाचे काम चालणाऱ्या शाळांसाठी मोठा संघर्ष भारतात महापुरुषांनी केलेला आहे. बहुजन वर्ग हा सुशिक्षित व सुसंस्कृत झाला पाहिजे यासाठी शाळांची स्थापना करून, त्यांचा विस्तार करून शालेय अध्ययनाची संस्कृती बहुजन समाजात महापुरुषांनी रुजवली. म्हणून शाळांना फार महत्त्व आहे. शाळेची स्वतःची एक शिस्त व कार्यपद्धती असते. शाळेत विद्यार्थ्याला दाखला घ्यावा लागतो. एकेक वर्ग उत्तीर्ण होऊन पदवीपर्यंतचे शिक्षण घ्यावे घ्यावे लागते. त्याशिवाय शाळेत प्रार्थना, प्रतिज्ञा, राष्ट्रगीत आणि परिपाठ होत असतो. अध्ययन अध्यापनाशिवाय शारीरिक शिक्षण, मूल्यशिक्षण यांचाही अभ्यास शाळेत होत असतो. आणि हे सर्व काम एका विशिष्ट वेळापत्रकानुसार सुरू असते. परिपाठामध्ये मुलांच्या अंगभूत गुणांचा भाषिक कौशल्याचा विकास व्हावा म्हणून त्याला समाविष्ट करून वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. अध्ययन अध्यापन करताना मुलांना प्रश्न विचारले जातात, जेणेकरून विद्यार्थ्याला वर्गात झालेले अध्यापन लक्षात आलेले आहे याची कल्पना त्या शिक्षकाला येत असते. अशा या शाळेमध्ये अगदी श्रीमंतांपासून ते पडक्या झोपडीतील गरीब विद्यार्थ्यांपर्यंतचे विद्यार्थी एकाच गणवेशात, एकाच बाकावर बसून शिकत असतात. शाळेत एकच गणवेश, एकच बाक, एकच पटांगण असल्याने भेदभावाचा संस्कार मुलांच्या मनावर होत नाही. त्यामुळे मानवता मूल्य वृद्धिंगत होत जाते. हा झाला एक भाग आणि दुसरे असे की, जो परिस्थितीने विपरीत आहे, वंचित आहे, गरीब आहे तोही आपल्या स्वतःला इतरांपेक्षा कमी लेखला जाणार नाही किंवा आपण कमी आहोत याची त्याला जाणीव होणार नाही हा ही एक भाग त्यामध्ये असतो. सदर कवितेत कवीने नेमका शाळेच्या याच कार्यपद्धतीचा उपयोग शेतमजुराच्या मुलाच्या दैनंदिन जीवनक्रमाशी जोडलेला आहे कवी म्हणतो,

"जो नेहमी प्रार्थनेला उशिरा येतो

दीड पायावर उभा राहत

म्हणतो प्रतिज्ञा कशी बशी

खरंतर तो आवरून आलेला असतो

घाईत गोठ्यातली काम."

कवितेच्या या पहिल्याच कडव्यात कवी एका विद्यार्थ्यांचे वर्णन करत आहे आणि हा विद्यार्थी विशेष करून ग्रामीण भागातला आहे. याची पूर्वसूचना आपल्याला या कडव्यातून मिळते. ती अशी की, जो आवरून आलेला असतो 'घाईत गोठ्यातली काम' गोठ्यातली काम करणारा हा जो विद्यार्थी आहे, त्याला गोठ्यातलं काम करावं लागतं म्हणून तो प्रार्थनेला उशिरा येतो. 'दीड पायावर उभा राहत' तो प्रतिज्ञा म्हणतो कशी बशी म्हणजे काय तर त्याचा अर्थ असा की त्याचे लक्ष हे त्याच्या कामावर आहे. किंवा त्याचा एक पाय दुखावला आहे तरीही तो काम करतो. आणि त्या कामाचा प्रभाव त्याच्या शाळेतल्या शिकण्यावर होतो म्हणूनच तो नेहमी प्रार्थनेला उशिरा येतो हा विद्यार्थी कोण आहे? तो ग्रामीण भागातला आहे पण तो कोण आहे ? याचं जे सूचन आहे ते मात्र इथे होत नाही. पुढे कवी म्हणतो,

"जो आठवड्यातून दोन तीनदा

हमखास दांड्या मारतो शाळेला

त्याचा गृहपाठ नसतो कधीच पुरा

खरंतर त्याला जावं लागतं वावरात

घराला हातभार लागावा म्हणून"

आठवड्यातली हमखास एक-दोन दिवस अशा विद्यार्थ्याकडून शाळेला दांडी मारली जाते. कारण तो वावरात काम करतो. त्याचं वय वावरात काम करण्याएवढं नाही परंतु त्याने जर वावरात काम केलं नाही तर त्याला उपाशीपोटी जगावे लागेल, त्याच्या कुटुंबाला पोसण्याची जबाबदारी त्याच्यावर येऊन पडलेली आहे. शाळा शिकणारा हा पोरगा वयाने लहान असला तरी त्याने घरातली जबाबदारी उचललेली आहे आणि म्हणून शिकण्यापेक्षाही त्याला महत्त्व आहे तर ते घरादाराच्या जबाबदारीचे.

अशा या पोराचे वर्णन करताना कवी म्हणतो, "ज्याच्या सदऱ्यावर ओघळ असतील घामाचे चड्डीला ठिगळ मागे वितभर कुबट वासही येत असेल कपड्यांचा खरंतर त्याला शाळेतूनच जावं लागतं मालकाच्या खळ्यात गणवेशासकट"

शाळेत येणाऱ्या या मुलाकडे गणवेशाव्यतिरिक्त इतर कपडे नाही. एकच गणवेश तो कित्येक दिवसापासून वापरत आहे. त्यामुळे त्याच्या गणवेशाला धुतल्या न गेल्यामुळे कुबट वास ही येत आहे. चड्डीला ठिगळ लागलेल आहे कारण त्या गणवेशासकटच त्याला मालकाच्या खळ्यात कामाला जावे लागते, अशा पोराच्या केवळ कपड्धाचेच वर्णन करून कवी थांबत नाही तर तो म्हणतो,

"ज्याच्या भेगाळलेल्या पायात असेल

टाचा घासलेली चप्पल अथवा बूट फाटलेला

काट्यांची कुरपही असतील बहुदा तळव्यात

खरंतर अनवाणी पावलांनीच

भटकत असतो तो शिवारभर"

त्याच्या पायात चप्पल नाही किंबहुना चप्पल किंवा बूट असेलच तर तो फाटलेला आहे वरून तो दिसत असला तरी तो असला काय आणि नसला काय त्याला अनवाणी पायानेच शिवारभर भटकत राहावे लागते. यामुळे त्याचे पाय भेगाळलेले आहेत आणि पायांच्या तळव्यात कुरुपही झालेली आहेत. भेगाळलेले पाय आणि दुखरे कुरूप घेऊन तो शाळेत येत असतो.

हा पोरगा शालेय अभ्यासक्रमापासून दूर असला तरी जीवनाच्या अभ्यासात मात्र तो पुढे आहे म्हणूनच कवी म्हणतो,

"जो नदीत मासे पकडतो सहज

सरपण जमावतो भर उन्हात

मध काढतो मधमाशांना हुसकावून

खरंतर तोंडपाठ आहे त्याला अख्ख जंगल

जीव जनावरांची बोलीही"

या पोराला शाळेतला अभ्यास कमी प्रमाणात येत असला तरी हा पोरगा जीवनाच्या अभ्यासक्रमात मात्र अव्वल आहे, कारण त्याला नदीत मासे पकडायचे, सरपण जमवायचे, मध कसे काढायचे याचे चांगलेच ज्ञान अवगत आहे. हे ज्ञान कुठल्याच शाळेत मिळत नाही. यासाठी स्वतः काबाड कष्ट करावे लागतात, यासाठी स्वतः रट्टे खट्टे खावे लागतात तेव्हा कुठे हे ज्ञान आत्मसात होत असतं. हे ज्ञान मिळवण्याचा अभ्यासक्रम कुठल्याच शाळेत उपलब्ध नसतो म्हणून निसर्गात वावरणार हा पोरगा निसर्गात रममाण होतो. गुरे चारतांना किंवा मध काढताना त्या प्राण्यांनाही इजा होऊ नये शिवाय त्या प्राण्यांशी याचे अदृश्य नातेसंबंध जोडलेले आहेत जणू काही त्यांने त्यांची बोलीच आत्मसात केलेली असते असा हा पोरगा शाळेच्या परीक्षेत मात्र,

"तो जेमतेम पास होईल

अथवा तुम्ही नापास ही करू शकता त्याला

खरंतर वर्गातल्या पोरांपेक्षा तो फार गुणी आहे

त्याला कुठल्या व्यवस्थेत बसवायचं ते सांगा मास्तर

तो शेतमजुराचा पोरगा आहे."

हा पोरगा शेतमजुराचा पोरगा आहे. शेताशिवाय आणि शेतात कष्ट केल्याशिवाय ज्याच्या घरातली चूल पेटणार नाही असा हा पोरगा आहे, त्यामुळे शिक्षण घेणं ही त्याच्यासाठी व त्याच्या कुटुंबासाठी चैनीची गोष्ट असते म्हणून तो त्याकडे दुर्लक्ष करतो म्हणूनच कवी म्हणतो की, तुम्ही त्याला मास्तर नापासही करू शकता पण तसं पाहिलं तर कवीच्याच भाषेत बोलायचं झालं तर 'खरं पाहिलं तर वर्गातल्या इतर पोरांपेक्षा तो फार गुणी आहे' परंतु तो शेतमजुराचा पोरगा आहे असा हा शेतमजुराचा पोरगा कुठल्या व्यवस्थेत बसवायचा हा खरा प्रश्न आहे.

सदर कवितेच्या शेवटी कवीने एक प्रश्न उपस्थित केलेला आहे तो प्रश्न असा की कुठल्या व्यवस्थेत या शेतमजुराच्या मुलाला बसवायचे? कारण या शेतमजुरांचा आर्थिक स्तर हा खूप खालावलेला आहे आणि कुठलीच शासनव्यवस्था या सर्व शेतमजुरांचा कैवार घेत नाही. सामाजिक व्यवस्थेत अशा शेतमजुरांची आर्थिक आणि सामाजिक शोषण होत असते. या शोषणामुळे ते शैक्षणिक व्यवस्थेपासून दूर राहतात. अभ्यासात हुशार असणारी ही पोर केवळ पोटभर अन्न मिळत नाही म्हणून त्यांना कामाला जावे लागते. पर्यायी ते अभ्यासापासून वंचित राहतात अशा वंचितांचे दुःख सदर कवितेतून कवीने मांडलेले आहे.

सदर कवितेचा आकृतीबंध हा विशिष्ट आहे. साधारण पाच कडव्यात अभिव्यक्त होणारी ही कविता या पाचही कडव्यांचे वैशिष्ट्य पाहिलं तर पहिल्या तीन ओळीनंतर येणारी चौथी ओळ ही 'खरंतर' या विधानाने पुढे जाते. यात कवीने विशिष्ट कलाटणी दिलेली आहे. कवी शाळेचा जो परीघ आहे किंवा शाळेची जी नियमित व्यवस्था आहे त्यावर भाष्य करतो आणि शेवटी त्याला कलाटणी देतो. हे असे करत असताना कवीने वाचकाला धक्का बसेल किंवा वाचकाला विचार करायला भाग पाडल्या जाईल अशा पद्धतीची रचना केलेली आहे. जर कवितेचे शीर्षक आधी वाचलेलं नसेल तर कवितेच्या शेवटच्या कडव्यात आपल्याला समजते की, शाळेत प्रार्थनेला उशिरा येणारा तो पोरगा किंवा ज्याचे कपडे फाटलेले आहे आणि पायाला भेगा पडलेल्या आहेत तो शेतमजुराचा पोरगा आहे. कवीला शेतमजुराच्या पोराविषयीचे दुःख मांडायचे आहे. हे दुःख कवीने स्वतः भोगलेले आहे, कवीने स्वतः अनुभवलेले आहे. ग्रामीण जीवनाशी त्याची नाळ जुळलेली असल्याने एक प्रकारे ही कविता कवीची आत्माभिव्यक्ती ठरते.

 https://youtu.be/NcviODAnNcE?si=5If1cGA9mJv1Xunt


१० टिप्पण्या:

  1. सर आपले ब्लॉग लेखन फारच सुरेख होत आहे.. नवा ग्रंथ या निमित्ताने येईल यात शंका नाही. लेखदर्जेदार आहे... भास्कर पाटील अकोला

    उत्तर द्याहटवा
  2. डॉ. अक्षय घोरपडे, आपण माझ्या या कवितेवर केलेले भाष्य आवडले. कवीला काय सांगायचं आहे ते आपण नेमक्या शब्दांत मांडले आहे. ही कविता अभ्यासताना या समीक्षणाचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल. खूप धन्यवाद!

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद ! नामदेवराव आपली कविता सहज, सरळ, सुबोध असून वर्तमानाला कवेत घेणारी आहे.

      हटवा
  3. अस्सल शेतकरी श्रमकरी कुटुंबातील आणि संस्कारी विद्यार्थ्याची ही वर्षभराची ज्ञानअर्जन करत दैनंदिन जगण्याची धडपड. अतिशय कमी व आशयपूर्ण शब्दात नामदेव दादांनी मांडली आहे.
    शेतकरी ग्रामीण भागातील वाचक यात स्वतःला शोधतो.
    खूप सुंदर ! हृदयस्पर्शी.

    उत्तर द्याहटवा
  4. सर कवितेची समीक्षा खूपच छान केली आहे.

    उत्तर द्याहटवा
  5. प्रथम वर्षाला शिकवताना आपण केलेली कवितेची समीक्षा उपयोगात येईल

    उत्तर द्याहटवा

जागतिकीकरण आणि आदिवासी

  जागतिकीकरण आणि आदिवासी डॉ . अक्षय किशोर घोरपडे. ·        गोषवारा  (Abstract) :- १९९० नंतरचा कालखंड हा भारतीय समाज जीवनात फार मोठा सा...